मुखवटे नसणार्या चेहर्यांपर्यंत पोहोचणे अवघड : कवी-गीतकार वैभव जोशी यांचे प्रतिपादन
डॉ. माधवी वैद्य लिखित ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ या पुस्तकाचे प्रकाशन
‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ हे पुस्तक अभ्यासकांसाठी ऐतिहासिक दस्तावेज : डॉ. पी. डी. पाटील
पुणे: ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ या पुस्तकातील कवी माझी दैवते आहेत, या कवींपर्यंत पोहोचणे म्हणजे आयुष्यभराचा चकवा लावून घेण्यासारखे आहे. या प्रत्येक कवीमधील माणसापर्यंत, त्यांच्यातील दैवी प्रतिभेपर्यंत पोहोचणे अवघड आहे. तुम्ही आयुष्यात एका कवीच्या व्यक्तिमत्त्वाला दोनदा भेटू शकत नाही, असे प्रतिपादन कवी-गीतकार वैभव जोशी यांनी केले. खूप मुखवटे असणार्या चेहर्यांपर्यंत पोहोचणे सोपे आहे, परंतु मुळात ज्यांच्याकडे मुखवटेच नाही, ज्यांना चेहरेच चेहरे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मराठी भाषेचे वैभव आपल्या काव्यनिर्मितीतून दाखविणार्या कवींना बोलते करताना, त्यातून मालिका साकारताना आलेल्या रोमांचक अनुभवांवर आधारित ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य लिखित पुस्तकाचे प्रकाशन बुधवार (दि. २३ मार्च २०२२) वैभव जोशी यांच्या हस्ते ज्योत्स्ना भोळे सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील होते, त्यांच्या हस्ते ‘कवी शब्दांचे ईश्वर’ मालिकेतील कवयित्री इंदिरा संत यांच्यावरील भागाचे प्रसारण करून आर्या कम्युनिकेशन्स, पुणे या यूट्यूब चॅनलचा शुभारंभ करण्यात आला. लेखिका वीणा संत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते ‘कवी शब्दांचे ईश्वर’ याचे ई-बुक अनावरण करण्यात आले. डॉ. माधवी वैद्य यांच्यासह बुकगंगा पब्लिकेशन्सच्या संचालिका सुप्रिया लिमये, संगीतकार राहुल घोरपडे व्यासपीठावर होते.
वैभव जोशी म्हणाले, पुस्तक वाचताना अनेक कवींच्या प्रदेशात फिरून आल्याचे जाणवले. एका कवीपर्यंत पोहोचतानाही आपल्यासारख्याला अवघड जाते, तेव्हा माधवी वैद्य यांनी १३ कवींपर्यंत पोहोचून त्यांचे शब्दवैभव आणि रूप आपल्यापर्यंत पोहोचविले, तेही कुठचा शॉर्टकट न घेता, खडतर प्रवास करून, हे खूप मोठे कार्य आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. पी.डी. पाटील म्हणाले, सुमारे २५ वर्षांपूर्वी झालेल्या मालिकेच्या अनुभवांचे पुस्तक झाले हे अभिनंदनीय आहे. हे पुस्तक अभ्यासकांसाठी उपयुक्त असून ते वाचल्यानंतर अभ्यासकांना नवीन कार्यासाठी बळ मिळेल. पुस्तकाद्वारे डॉ. वैद्य यांनी पटकथेमागील कथा उलगडून दाखविली आहे. मालिका आणि पुस्तकाच्या माध्यमातून कवी पलिकडील कवी शोधण्याचा प्रयास केला आहे. प्रत्येक कवीला भेटणे, त्याला बोलते करणे हे मनस्वी काम आहे, ते डॉ. माधवी वैद्य यांनी उत्तम प्रकारे साकारले आहे. हे मोठे कार्य पूर्ण झाले असले तरी थांबू नका, अजून काम करीत राहा, अशा शुभेच्छा देऊन एक ऐतिहासिक दस्तावेज निर्माण केल्याबद्दल डॉ. वैद्य यांचे अभिनंदन केले.
वीणा संत म्हणाल्या, कवी, त्यांचे घर, त्यांचा स्वभाव या विषयी जाणून घेण्याची सर्वसामान्यांच्या मनात इच्छा असते, या मालिकेद्वारे ती सफल झाली. कवीच्या व्यक्तिगत भावजीवनातील गोष्टी कवीला घडवत असतात, त्याच्या जाणिवांना प्रगल्भ करीत असतात. ‘कवी शब्दांचे ईश्वर’ मालिकेद्वारे कवीचे आरशातील स्वच्छ प्रतिबिंब दाखविले गेले आहे. या पुस्तकाद्वारे अभ्यास आणि मनोरंजन अशा दोन्ही गोष्टी साधल्या गेल्या आहेत.
राहुल घोरपडे म्हणाले, यातील एक-एक कवी हा अनेक वर्षांच्या अभ्यासाचा विषय आहे. रंजक तरीही अभ्यासपूर्ण असा हा पुस्तकरूपी दस्तावेज आहे. मराठीतील दिग्गज कवींच्या रूपातील हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, तन-मन-धन वेचून केलेल्या कामाचा हा लोकार्पण सोहळा आहे. कवितेने मला उत्तम माणसांशी जोडले. हे पुस्तक अभ्यासकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. मालिका ते पुस्तक हा प्रवास त्यांनी उलगडून दाखविला.
सुप्रिया लिमये यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल घोरपडे, सुप्रिया लिमये, डॉ. माधवी वैद्य यांनी मान्यवरांचे स्वागत केले. धनेश जोशी यांनी ना. धों. महानोर यांच्या संदेशाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शेणई यांनी केले.
हे पुस्तक बुकगंगा डॉटकॉम वरून घरपोच मागवण्यासाठी तसेच त्याचे ई-बुक विकत घेण्यासाठी खाली तपशील दिले आहेत किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपकरा.